शिकलेली असहाय्यता आणि गुरू पौर्णिमा


गुरुपौर्णिमेच्या मंगलमय शुभेच्छा!

"असतो मा सद्गमय।
तमसो मा ज्योतिर्गमय।
मृत्योर्मा अमृतं गमय॥"
— बृहदारण्यक उपनिषद
"असत्याकडून सत्याकडे, अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे आणि नश्वरतेकडून अमरत्वाकडे ने."

भारतीय संस्कृतीत गुरू म्हणजे केवळ ज्ञान देणारी व्यक्ती नाही, तर अंधारातून प्रकाशाकडे नेणारे गुरुतत्त्व आहे. 

जीवनात अनेकदा असे क्षण येतात की आपण वारंवार बोलतो, प्रयत्न करतो; पण आपले ऐकले जात नाही. अशा वेळी फक्त समस्या वाढत नाहीत, तर मनातील आशाही हळूहळू मावळू लागते. मानसशास्त्रात यालाच "शिकलेली असहाय्यता (Learned Helplessness)" असे म्हणतात. मानसशास्त्रज्ञ Martin Seligman यांनी स्पष्ट केलेली ही संकल्पना सांगते की, सततचे अपयश, अन्याय किंवा नकार यामुळे माणूस "मी काहीही केले तरी काही बदलणार नाही" असा समज करून घेतो आणि प्रयत्न करणेच सोडून देतो.

परंतु भारतीय ज्ञानपरंपरा आपल्याला निराशेच्या गर्तेत अडकून राहायला शिकवत नाही. 

उद्धरेदात्मनात्मानं नात्मानमवसादयेत्।
आत्मैव ह्यात्मनो बन्धुरात्मैव रिपुरात्मनः॥ 
- गीता ६.५
माणसाने स्वतःच्या मनाने स्वतःचा उद्धार करावा, स्वतःला अधोगतीकडे नेऊ नये. कारण मन हेच माणसाचा मित्र आहे आणि मन हेच माणसाचा शत्रू आहे. असेच वचन तथागतांनी ही सांगितले आहे,
"अत्त दीपो भव"
- महापरिनिब्बाण सुत्त
स्वतःचा मार्ग दाखवणारा दिवा स्वतः व्हा.

गुरुतत्त्वाचा खरा संदेश हाच आहे की, निराशा हा अंत नसतो; ती नव्या प्रकाशाची सुरुवात असते.
अंधार कितीही दाट असला तरी एका ज्ञानदीपाने तो दूर होऊ शकतो.

या गुरुपौर्णिमेच्या पवित्र दिवशी आपण आपल्या सर्व गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त करूया आणि संकल्प करूया.

अज्ञानापेक्षा ज्ञानाची,
निराशेपेक्षा आशेची,
भीतीपेक्षा धैर्याची,
आणि असहाय्यतेपेक्षा 
सतत प्रयत्नांची निवड करूया.

मला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष शिकवण देणाऱ्या सर्व गुरुजनांना विनम्र प्रणाम! आणि गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! 💐🌹

Comments

Popular posts from this blog

पळसदेवाचे विष्णू (?) मंदिर - उजनीच्या पाण्यात दडलेले रामायण शिल्प वैभव.

मातृदिनाच्या निमित्याने शिल्प शुभेच्छा

चुंबन: प्राचीन भारतीय श्रृंगाराविष्कार